Sunday, 14 February 2021

प्रेमाचा दिवस वगैरे वगैरे..


 



आज व्हॅलेन्टाईन..प्रेमाचा दिवस! प्रेम व्यक्त करण्याचा दिवस वगैरे वगैरे. पण खरंच व्यक्त करता येतं का हे प्रेम? का व्यक्त न होता, आत कुठंतरी खोलवर, चिखलात रूतून पडलेल्या कर्णाच्या रथाच्या चाकासारखं होऊन बसतं. बाहेर निघायचं असतं पण निघणंच अवघड होऊन जातं. खूप काही बोलायचं असतं पण नाही बोलता येत. कितीही प्रयत्न केले तरी शक्य नाही होत. एक वेगळीच अनामिक भीती मनात दाटते. खरंच कळत नाही अश्यावेळी. एकाबद्दल आपल्याला काहीतरी वाटतंय आणि ते त्याला स्पष्टपणे सांगता येत नाहीये, हाच कदाचित नात्याचा कमकुवतपणाही असेल पण यामागे अनेक वेगळीही कारणं असतात.

 आपल्याला समोरच्याबद्दल जे मनापासून वाटतंय, जाणवतंय ते काही वेळासाठी आहे का आयुष्यभरासाठीचं आहे, प्रेम आहे पण दाखवण्याची कृती होत नाहीये का, समोरच्याबद्दलची जाणीव भूतकाळातील गोष्टींमुळे निर्माण झाली आहे का, आपल्या आयुष्यात कोणीच नाही म्हणून कोणीतरी असं आहे का, स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणीतरी हवंय का अश्या अनेक प्रश्नांनी प्रेम व्यक्त करणं अशक्यप्राय होऊन बसतं. आपण आपल्या आयुष्यात त्या व्यक्तींशी रोज बोलतोय, त्यांना सारखं भेटतोय, दिवसभर काय केलं याचा इतिवृत्तांत देतोय अशा व्यक्तींना मला तुमच्याविषयी काहीतरी जाणवतंय हे कसं व्यक्त करायचं?

 मला माहितीये अनेकांचं प्रेम फार नितळ असतं, अगदी कुसुमाग्रजांच्या कवितेसारखं. डायरेक्ट मेघापर्यंत पोहचलेलं. समोरच्याच्या आनंदात आपला आनंद शोधणारं. Space आणि time विसरून मनसोक्त बागडणारं. स्वतःच्या विरहात समोरच्याचा आनंद पाहणारं. पण हे व्यक्त करायचं म्हटलं तर नाही होत आपल्याकडून. त्यासाठीचं धाडस कुठून आणायचं नाही कळत. Patience हवा, आधी स्वतःवर प्रेम करायला शिकायला हवं, हे काय वय आहे का प्रेमात पडायचं, संस्कार कुठे गेले फिरायला, हे जर बाहेर कळलं तर समाज काय म्हणेल यांसारख्या वाग्बाणांनी तुम्ही अधिक घायाळ होता. मग काय कमीपणाची भावना आणि नुसता प्राक्तनाला दोष. नैराश्य खायला उठतं अश्यावेळी.  

 काहीजण हे सगळं सहन करतात, काहीजण हेच आपलं प्राक्तन म्हणून याचा स्वीकारही करतात पण काहीजण स्वतःचं आयुष्य संपवायलाही मागंपुढं पाहात नाही. आपल्याला नाकारल्याची भावना आपण सहन करू शकणार नाही म्हणून कदाचित. कोणापुढेच ते बोलत नाही. प्रेम व्यक्त करायला अवघड जातंय म्हणजे प्रेम करायला किती अवघड गेलं असेल याची कल्पना पण करता येत नाही.    

 खरंच केवढं विचित्र आहे ना हे सगळं? प्रेम व्यक्त करण्याची भीती जीवघेणी कधी होते हेच कळत नाही. एवढी सुंदर भावना क्षणात नकोशी होती. आता काहीजण म्हणतील की बोलून मोकळं व्हायचं. तुमचा नात्यावर, समोरच्यावर आहे ना विश्वास तर तुम्हाला मोकळं व्हायला काहीच अडचण निर्माण झाली नाही पाहिजे. पण तुम्ही एकदा स्वतःला विचारा खरंच ते शक्य आहे का? (मला माहितीये की इथे प्रत्येकजण आपापली लढाई लढतोय. तेव्हा माझी लढाई केवढी मोठी किंवा बघा मी किती जखमा झेलल्या आहेत असं माझा रोख नाहीये) आणि जर एखादा व्यक्ती असेल भावनाशील तर त्याने काय करायचं? निम्मं आयुष्य रडण्यात जाईल त्या बिचार्‍यांचं. आणि Practical विचार करायचा म्हटला तर स्वतःशीच प्रतारणा. नक्की करायचं काय अश्यावेळी?

 आपल्या आयुष्यात प्रेमात पडणं फार सोप्पं आहे असं म्हणतात आणि ते टिकवणं अवघडे असंही म्हणतात. पण मला काय वाटतं की प्रेम व्यक्त करणं अधिक अवघडे. सामाजिक चौकटीत आपण एवढं गुरफटून गेलोय की मला तुझ्याबरोबर वेळ घालवायला आवडतो हे बोलायलाही वेळ मिळत नाही. काहीवेळा आपण लगेच bore होतो. समोरच्याचा वीट येतो, नात्याचा वीट येतो. बदल लागतो आपल्याला. अश्यावेळी व्यक्त का व्हायचं असंही होतं. पण तेव्हा आपण खूपच स्वार्थी होतोय का याचं आत्मपरिक्षण एकदा करायला हवं. असो. मला अनेक प्रश्न पडले आहेत. आणि याचाच मी कित्येक दिवस विचार करतोय आणि काल मध्यरात्री मला हे सगळं थोडंफार शब्दात बांधता आलंय.

 आज प्रेमाचा दिवस, प्रेमाचा दिवस म्हणून गवगवा करण्याआधी निस्सीम प्रेम करून, निर्भीडपणे व्यक्त करण्याची धमक अंगात असली पाहिजे एवढं मात्र नक्की! प्रेम करताना दाखवलेलं धाडस, व्यक्त करतानाही दाखवायला हवं आणि यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल. मला वर पडलेल्या सर्व प्रश्नांचं उत्तर माहीत नाही पण तुमचा तुमच्यावर विश्वास असेल आणि समोरच्याबद्दल असलेली जाणीव, भावना टिकवून ठेवण्याची मनापासून इच्छा असेल तर नक्की तुम्ही यशस्वी व्हाल!


Wednesday, 26 August 2020

विघ्नहर्ता!




आज गणेश चतुर्थीनंतरचा पाचवा दिवस. आमच्या घरच्या गणपतीचं आज विसर्जन. दरवर्षी बाप्पा जाताना डोळ्यांमधे अश्रू देऊन जातो पण आज पहिल्यांदाच  डोळ्यांमधे आनंदाश्रू आहेत. आमचे सगळे विघ्न हरून बाप्पा त्याच्या घरी चालला आहे. खरंतर त्याला निरोप द्यावासा वाटत नाहीये कारण एवढ्या मोठ्या संकटातून त्याने आमची सुटका केलीये. आज मला पहिल्यांदाच मूर्तीमागच्या खऱ्या देवत्वाची जाणीव झालीये. असो. आता हे विघ्न नक्की कोणतं होतं असा तुम्हाला प्रश्न पडला असेल.


९ ऑगस्ट २०२० रोजी माझ्या वडिलांची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली. सकाळी सकाळीच वाॅर्ड ऑफिसमधून फोन आला आणि बाबांचे नाव पाॅझिटिव्ह असलेल्या लोकांच्या यादीत आहे असं कळलं. खरंतर हा खूप मोठा धक्का होता. चार पाच दिवसांपूर्वीच त्यांना ताप येत होताजात होता पण कुठेही हा कोरोना असेल असं जाणवत नव्हतं. सगळे रिपोर्टस नाॅर्मल होते. अगदी छातीचा एक्स रे ही. कारण बाबा जास्त बाहेर पडायचे नाही. अगदी ऑफिसला जाणंही त्यांनी अलीकडेच सुरू केलं होतं. पण आता जी परिस्थिती निर्माण झाली तिला स्वीकारणेही गरजेचं होतं. मग आम्ही सगळ्यांनी म्हणजे मीआई आणि दिदीने विचार केला की बाबांना घरीच विलगीकरणात ठेवायचं. कारण लक्षणं सौम्य होती. तेव्हा बाहेरच्या परिस्थितीचाही विचार केला. अनेक रूग्णांना बेड उपलब्ध होत नाहीयेत अशा पार्श्वभूमीवर आपल्याकडे गृह विलगीकरणाची व्यवस्था असताना कशाला कोणाची जागा अडवायची. बाबाही तयार झाले. खरंतर ते टेस्ट करण्यापूर्वीच म्हणजे तीन-चार दिवसांआधीच वेगळे राहत होते.

 

मग नंतर Contact ट्रेसिंगसाठी पोलिसांचे फोन आले. त्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांनी आम्हालाही टेस्ट करून घ्यायला सांगितली. मग लगेचच आम्ही घराजवळच असलेल्या शरद पवार बहुउद्देशीय हाॅल कोविड तपासणी केंद्रावर गेलो आणि स्वॅब देऊन आलो. खरंतर आम्हाला कोणतीच लक्षणं नव्हती. पण काय माहित एक वेगळीच अनामिक भिती तेव्हा वाटत होती. आपण सगळं जर पाॅझिटिव्ह आलो तर बाबांकडे कोण बघणारत्यांच्या जेवणाचं काय. शेजारचे असले तरी आपलं माणूस आपल्याजवळ असेल तर अधिक धीर वाटतो, Willpower वाढते त्यामुळेच आमच्या सगळ्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्हच यावेत असं मनापासून वाटत होतं आणि खरंच ते निगेटिव्ह आले.

 

पण मग एके दिवशी बाबांना चक्कर यायला लागलीडोकंही प्रचंड दुखत होतं. मग जवळच्याच डाॅक्टरांना दाखवलं तर त्यांनी छातीचा एक्स रे काढायला लावला तर त्यात न्यूमोनियाची सुरवात झालेली दिसली. आम्ही परत हादरून गेलो. तेव्हा माझ्या दोन काकांनी धीर दिला. त्यांनी त्वरित निर्णय घेतले आणि जवळच्याच हाॅस्पिटलमधे बाबांना ॲडमिट केलेतुम्ही कसलीच काळजी करू नकावाघ लवकर बरे होतील अशा सकारात्मक बोलण्यातून त्यांनी आमचं मन अधिक खंबीर केलं. आमच्या घराजवळच्या मेडिकलवाल्या दादानेही मोठी मदत केली. गरजेवेळी घरपोच औषधे देणं असेलतुम्ही पैसे नंतर द्याआपलं घरचंच दुकान आहे असा विश्वासक सूर असेल त्याने कधीही आम्हाला नकार दिला नाही.   

 

बाबांना हॉस्पिटलमधे ॲडमिट केल्यावर आमची खरी परीक्षा सुरू झाली. बाबांना सकाळी काढाथोड्यावेळाने नाष्टामग दुपारी जेवणसंध्याकाळी चहा मग रात्रीचं जेवण अशा माझ्या भर पावसातल्या फेर्‍या सुरू झाल्या. घरी आई आणि दिदीचीही कसरत चालू होती. आधी बाबांसाठी बनवून मग आमच्यासाठी बनवायला लागायचं. परत बाबांचे कपडे असतीलजेवण झाल्यानंतरची भांडी असतील ते सगळं गरम पाण्यात टाकून काही वेळाने धुवायला लागायचं. मी बाहेरून आलो की स्वतःला नीट सॅनिटाईझ करून अंघोळ करायला लागायची. बाकी कोणत्याच गोष्टींकडे वेळ द्यायला अजिबात जमत नव्हता. आणि या सगळ्यातच स्वतःचं मानसिक आरोग्यही शांत ठेवायचं होतं.







मला माझं मानसिक आरोग्य शांत ठेवायला मीम्सची खूप मदत झाली. मीम्सबरोबरच माझ्या फेसबुकवरच्या मीमर्स मित्रांनाही मला मानसिक बळ दिलं. त्याचबरोबर माझ्या जवळच्या मित्रांनाही (दोन-तीन जणांनी) मला खूप मदत केली. जास्त जणांना मी सांगितलं नसल्यानं त्यांना कल्पना नव्हती. खरंतर जास्त जणांना न सांगण्याचं मुख्य कारण म्हणजे मी ही संपूर्ण परिस्थिती नव्याने पाहत होतो. उमजून घेत होतो. तसं एक पत्रकार म्हणून रोज बातम्या पाहत होतोऐकत होतो पण आज पहिल्यांदाच माझ्यावर ही परिस्थिती गुदरली होती. आणि त्याचा काहीच अंदाज न घेता बाकीच्यांना त्याच्यात ओढणं मनाला पटलं नाही. मला माहितीये प्रत्येकजण संवेदनशील असतो. प्रत्येकालाच मदत करायची इच्छा असते. पण यावेळेस मी माझ्या मनाचा कौल घेतला.




तिकडे माझ्या फेऱ्या चालूच होत्या अगदी बाहेरच्या पावसासारख्याच. बाबांची प्रकृतीही सुधारत होती. दम लागणं कमी झालंतापही बंद झाला. पण विलगीकरणाचा कालावधी अजून संपला नसल्याने बाबा अजून ॲडमिटच होते. मग १७ ऑगस्टला बाबांना डिस्चार्ज मिळाला. त्याच शुभदिनी आम्ही आमच्या बाप्पाचेही बुकिंग केले. विलगीकरण अजून चालूच असल्याने बाबा घरातच वेगळीकडे राहत होते. पण आता मनावरचं ओझं बऱ्यापैकी हलकं झालं होतं. मग प्रसन्न मनाने बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू केली.




कालच बाबांचं विलगीकरण संपलं. बाप्पा आल्यावर आरतीसाठी बाबा व्हिडिओ कॉलवरून कनेक्ट व्हायचे आणि आज बाबा आमच्यासोबत आरतीला उभे आहेत. खूपच वेगळी सुखावह भावना आहे ही. आणि त्यासाठी आजचा दिवस तर खूपच विशेष आहे.

मला सगळ्यांना सांगायचं आहे की कोरोना हा विषाणू अत्यंत संसर्गजन्य आहे. याची लागण कशी होतेयाची लक्षणं नक्की कोणती आहेत याचा अंदाज आपल्याला येत नाही. त्यामुळे आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आपणच काहीवेळा कठोर होऊन घरातही सामाजिक अंतर पाळायला हवं. जे आम्ही एप्रिलपासून पाळत आहोत. वेगवेगळं झोपत आहोतजेवतानाही सामाजिक अंतर ठेवूनच जेवण करत आहोत. ही काळजी घेण्याबरोबरच बाहेर कोणी आवश्यक कारणासाठी जात असतील तर त्यानेही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आपण जर पॉझिटीव्ह निघालो तर आपल्याबरोबर आपल्या घरच्यांनाही त्रास होणारे याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी. बाहेर जाताना मास्कचासॅनिटाइझरचा वापर करायला हवा. बाहेरून आल्यावर गरम पाण्याने अंघोळ करून वाफ घ्यायला हवी. सर्वात शेवटी हा एक आजार आहे. जो कोणालाहीकधीहीकसाही होऊ शकतो. बाकीच्यांबरोबरच ज्यांना तो झालाय त्यांनीही स्वतःची काळजी घ्यायला हवी आणि सगळ्यात आधी आपलं मन कसं खंबीर राहील याचा विचार करायला हवा.  



 

 

 

 

 

 

 

 

 

 


Saturday, 15 August 2020

प्रिय माहीस...


प्रिय माही,

आज भारताच्या ७४व्या स्वातंत्र्यदिनी तू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तुझी निवृत्ती जाहीर केली. तुझ्या पाठोपाठ तुझ्या मित्रानेही निवृत्ती घेतली. हे सगळंच किती अनपेक्षित आहे ना?! तुझ्याशिवाय आता क्रिकेट कसं बघायचं? हाच मुख्य प्रश्न आता मला सतावत आहे. सचिननंतरही हाच प्रश्न मला पडला होता पण तुझं माझ्या आयुष्यात एक वेगळं स्थान आहे. जेव्हा क्रिकेटचा क सुद्धा माहित नव्हता तेव्हापासून मी तुला पाहत आलो आहे. तुझा आक्रमक आणि वादळी खेळ पाहून मलाही प्रत्येक बाॅलवर सिक्स मारायची इच्छा व्हायची. तुझ्यासारखेच मोठे केस ठेवून सर्वत्र मिरवावं असंही वाटायचं (जे अजूनही वाटतं).

नंतर द्रविडनंतर तू कॅप्टन झालास. तुझे ते वादळी खेळणं आता संयमित होताना दिसलं. तुझ्याच नेतृत्वाखाली भारतीय संघ अधिक बहरत गेला (अर्थातच त्यात गांगुलीचेही योगदान आहे). तुझ्यावर त्याने टाकलेला विश्वास तू सार्थ ठरवला. आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच तू संघावरही लक्ष ठेवलंस.





तुझी संयमी वृत्ती, चिकाटी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघातल्या प्रत्येक खेळाडूला समजून घेऊन, त्याच्यावर विश्वास दाखवून त्याला कायम प्रोत्साहन देणं मला खूप जास्त भावलं. त्याचबरोबर कोणतीही ट्राॅफी जिंकली तरी ती संघातल्या नवीन खेळाडूंकडे देऊन तुझं एका कोपर्यात उभं राहणं मनाला एक उगाचच भावनिक किनार देऊन जायचं. कितीही हायप्रेशर सामना चालू असतानाही तुझं मैदानात असणं बघून एका क्षणात प्रेशर नाहीसं व्हायचं. यष्टीरक्षणाबरोबरच तू भारतीय संघाचंही कायम रक्षण केलंस. चाहत्याचं कौतुकही मान्य केलं, टीकाही सहन केल्या.


तुझ्या आजवरच्या या सगळ्या प्रवासात तू कायमच भारतीय संघाला प्राधान्य दिलं. शेवटपर्यंत मैदानावर राहून संघाचा विजयही साकार केला तर कधी अथक प्रयत्न करून मिळालेली हारही आपल्या खांद्यावर घेतली. तुझे states काय आहेत, तू किती धावा केल्या आहेत, कितीवेळा शतक केलं आहे यासारख्या प्रश्नांना तू तुझ्याच शैलीत संयमित उत्तर दिलंस. तुझ्याच नेतृत्वाखाली जिंकलेले दोन विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, दोन एशिया कप आणि टेस्ट क्रिकेटमधे पहिला क्रमांक याचीच ती साक्ष आहे आणि अर्थातच तू याचा कधी गवगवा केला नाहीस.


आता मागच्याच वर्षी तू तुझ्या शेवटच्या सामन्यात धावबाद झालास. आमच्या आशेचा किरण एका क्षणात लुप्त झाला. तुझं ते धावबाद झाल्यावर, चेहर्यावर क्षणभरच दिसलेलं शल्य खरंच मनाला पोखरून गेलं रे. त्यानंतर तू निवृत्त होणार अशा वावड्याही उठल्या पण तू त्यावर काहीच व्यक्त झाला नाहीस. तुझ्याच शैलीसारखं, तू तुझ्या खेळीतूनच उत्तर देशील अशी भाबडी आशा माझ्यासारखे चाहते वर्षभर बाळगून होते, अगदी कालपर्यंतही. तू परत मैदानावर दिसशील आणि या वावड्यांना मैदानाबाहेर भिरकावून देशील असं मनापासून वाटत होतं. पण तू सर्वांना एक अनपेक्षित धक्काच दिलास. पहिल्या सामन्यात धावबाद झालेला तू, तुझ्या शेवटच्या सामन्यातही धावबाद राहिलास. मला माहितीये तू तुझ्या स्वातंत्र्याचा विचार करून निर्णय घेतलास पण आमचं तुझ्यावर प्रेम करायचं स्वातंत्र्य कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. ते अबाधितच राहिल..अगदी तुझ्या हेलिकॉप्टर शाॅटसारखं!


तुझाच एक चाहता. 
मयूर वाघ.

Monday, 15 June 2020

ऐकणारे कान आहेत जवळ, फक्त तुम्ही बोलून बघा!


डिप्रेशन म्हणजे नक्की काय?
डोकं रिकामं केलं तरी
त्याला उत्तर 
देता आलं नाही
रात्र जागवत असतो म्हणे.

चित्रविचित्र रात्र असली 
तरी तो जागतो 
रिकाम्या नभाकडे 
एकटक पाहत असतो.. 
त्यावेळी त्याला 
कसली शुद्ध नसते 
अशातच 
रात्रीच्या नीरव शांततेत 
दूर कुठेतरी 
कुत्रीही भुंकत असतात 
उगाचच 
शांततेला आव्हान. 

तो तरी निश्चलपणे
नजर कायम ठेवतो
काय माहित 
रिकाम्या नभात
कुणाला शोधत असतो 
तेव्हा खोल गेलेले डोळे 
डोळ्यांखालची वर्तुळे
उगाचच भयानक वाटतात 
डोक्यावरचे 
दोन-चारच 
पांढरे केस
वेगळे वाटतात 
हे असं असतं का डिप्रेशन? 

बाह्य रूप बदललं तरी 
तो आतून किती पूर्ण आहे? 
भयाण रिकाम्या शांततेत 
त्याचा मोठा आवाज आहे 
गालावर सुकून गेलेल्या 
आसवांमध्ये नक्की 
कसली भीती 
दाटली आहे? 

त्याच्या डोळ्याखालच्या 
वर्तुळात हरवताना 
विचाराने दिशा पकडली

आता डिप्रेशन म्हणजे नक्की काय? 
याचं उत्तर मिळालं होतं..
रात्र जागवली याचं दुःख होतंच
पण खोल गेलेल्या डोळ्यांनी 
आज डिप्रेशन पाहिलं होतं!


मागच्याच वर्षी ही कविता लिहिली होती. तेव्हा डिप्रेशन म्हणजे नक्की काय असतं याचाच विचार डोक्यात चालू होता. त्या विचारामुळे मला अनेक प्रश्न पडत होते. 

डोक्यात चाललेले नकारात्मक विचार, एकटेपणा, सतत मिळणारं अपयश, नाकारल्याची भावना, जवळच्या व्यक्तींकडून होणारं दुर्लक्ष किंवा होणारा त्रास, कोणीतरी कमी लेखत असल्याची भावना यांसारख्या गोष्टींमुळे डिप्रेशन निर्माण होतं का? आणि जर होत असेल तर याचा बाह्य रूपावरही परिणाम होतो का? आणि बाह्य रूप जरी बदललं तरी प्रश्न कायम राहतात का उत्तरे मिळतात? यांसारखे प्रश्न मला सतत पडत होते. डिप्रेशनवर कविता लिहिण्याच्या नादात मीही ती phase अनुभवत होतो. 

पण या ड्रिपेशनचा विचार करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे, मनुष्य जेव्हा जन्माला येतो. तेव्हा त्याच्या डोक्यात काहीच गोष्टी नसतात. टोटल कोरी पाटी असते. पण जसजसं आयुष्य सुरू होतं. तसं त्याच्याकडे जबाबदार्‍या येतात. त्यांच्याच जोडीला नवीन नाती येतात.

ती नाती सांभाळत असतानाच मूलभूत गरजांचाही त्याला विचार करायला लागतो. सगळी कसरतच असते ही. या कसरतीत काहीजण लगेच सराईत होतात तर काहींना वेळ लागतो. पण प्रत्येकाला ही कसरत करावीच लागते. पण या कसरतीच्या खेळात स्वतःकडे दुर्लक्ष होतं. आपण या कसरतीत एवढं गुंतून जातो की आपल्याला आपला विसर पडतो.

हा विसर मग अनेक प्रश्न निर्माण करतो. त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपण प्रयत्नही करतो. स्वतःच्या पातळीवर किंवा जवळच्या नात्यांची मदत घेऊन, पण एकाबाजूला आपल्याला कसरतीतही जायचं असतं. तिच्यातील स्पर्धा आपल्याला खुणावत असते. त्यासाठी आपण काहीवेळा प्रश्न तसेच ठेवून परत कसरतीत घुसतो. तोपर्यंत त्या प्रश्नांचा ढिग होण्यास सुरवात होते. एकामागून एक प्रश्न असे ते येतच राहतात. पण आपण त्याकडे लक्ष देत नाही.

एकेदिवशी मग आपल्याला त्याची जाणीव होते. अशावेळी तुम्ही त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करता, जवळच्या नात्यांची मदत घेता, त्यांच्याकडं व्यक्त होता, मनात कसलाही विचार न ठेवता तुम्ही ती उत्तरं मिळवण्याचा मनापासून प्रयत्न करायला लागता. 

पण याचं दुसरं गंभीर टोक म्हणजे मृत्यू. एवढे प्रश्न समोर आहेत आणि त्यांचं सगळ्यात सोपं उत्तर म्हणजे मृत्यू अशी भावना तेव्हा तयार होते. तुम्हाला कोणताही त्रास नको असतो. प्रश्नांच्या पलीकडचं जग तुम्हाला खुणावत असतं. कसरतीच्या नादी लागून स्वतःमध्ये केलेले बदल तुम्हाला आपले वाटत नाही. एकटेपणा जरी असला तरी तो आपला वाटतो.तुमची ही भावना दुसऱ्यांसाठी जरी नकारात्मक असली तरी तुमच्यासाठी तेव्हा ती सकारात्मक होऊन जाते. अंतिम निर्णय तुमचा असतो आणि तुम्ही त्याला अधीन होता. आणि मग उरते फक्त स्मशानशांतता! 

आता आपल्याला ठरवायचं आहे. कारण कसरत तर सर्वांनाच करायची आहे. तिला सोडून चालणार नाहीये. आपणच जर पहिल्यापासूनच प्रश्न सोडवत गेलो तर वरची परिस्थिती निर्माणच होणार नाही. आता हे प्रश्न नक्की कोणते आहेत याचा प्रत्येकाने आपापला विचार करून ठरवायचे आहेत. एकदा का प्रश्न शोधले की परत त्यांची उत्तरे शोधण्यासाठी वेळ नाही लागणार.

तुम्हाला हे जर अवघड जात असेल तर यासाठी बिनधास्त दुसर्‍यांकडे मदत मागा, माझ्याकडे मागा. मनात कसलीही आडकाठी न ठेवता, आपल्याला कोणीतरी जज करेल ही भावना न आणता मोकळेपणानं व्यक्त व्हा कारण ते गरजेचं आहे. कदाचित तुम्हाला पडलेले प्रश्न त्यांनाही पडलेले असतील, त्यांचे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. यात प्रश्न शोधणं महत्त्वाचं आहे.

आणि त्याबरोबरच हेही लक्षात घ्या की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेलच असं नाही. काही प्रश्न अनुत्तरीतच असतात. कदाचित तेच त्या प्रश्नांचं उत्तर असतं. सो उत्तरं मिळवण्याच्या मागे न लागता प्रश्न शोधायला शिका. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे आयुष्य कठीणच आहे. आपल्याला सर्वांची साथ घेऊन, वेळेप्रसंगी दुसर्‍यांना साथ देऊन ते फक्त जगायचं आहे. आपल्या हक्काचं बनवायचं आहे. जगण्यात मजा आहे बाॅस, अडचणी नसतील तर ते आयुष्य कसले. आणि ऐकणारे कान आहेत जवळ, फक्त तुम्ही एकदा बोलून बघा!


Thursday, 16 April 2020

घालमेल


खरंतर खूप दिवसांपासून काय लिहू असा प्रश्न पडला होता. एकतर मला उगाच काहीतरी लिहायचं आहे म्हणून काहीही लिहायला आवडत नाही. जोपर्यंत आतून असं काही दाटून येत नाही. माझे दुःख, माझे सुख मनाची परिसीमा गाठत नाही तोपर्यंत माझी लेखणी थंड असते. हे वागणं थोडं अतिशयोक्तीचं वाटलं तरी हेच सत्य आहे. असो. माझ्या या ब्लॉगला गुढीपाडव्याच्या दिवशी पाच वर्षं पूर्ण झाली. २०१६च्या सुरवातीला म्हणजे ८ एप्रिलला ब्लॉग सुरू केला.
तेव्हा स्वतःच्या आयुष्याचं प्रदर्शन करायचं आहे म्हणून चला ब्लॉग लिहूयात असा अजिबातच विचार केला नव्हता. खूपजण लिहितात म्हणून आपणही लिहूयात, वाहत्या गंगेत आपलेही हात धुवून घेऊयात असे तेव्हा काही हेतू नव्हते. मी लिहलेल्या सर्व लेखांचं, एकाच ठिकाणी, छानसं काहीतरी डॉक्युमेंटेशन होईल, केवळ हाच प्रांजळ विचार मनाशी बांधून ब्लॉगला सुरवात केली.
पण नंतर जसे दिवस जायला लागले तसे लेखांमध्ये स्वतःचे चित्र उमटायला लागले. मी स्वतःला या माध्यमातून जास्त व्यक्त करायला लागलो. मी लिहीत असलेल्या लेखांमधूनच माझा (मी मानत असलेला) स्वार्थीपणा माझ्या नकळतच लेखांमध्ये डोकवायला लागला. मग तो 'बदल, आत्मशोध ते आत्मबोध, वाढदिवस' यांसारख्या लेखांमधून आपल्याला जाणवलं असेल. नंतर मला आवडणाऱ्या खाद्यपदार्थांवरही मी लेखमाला सुरू केली. त्यातूनही आपल्याला जाणवलंच असेल. स्वतःची अशी मानसिक, सामाजिक, बौद्धिक वाढ या ब्लॉगच्या निमित्ताने व्हायला लागली.

पण मग मधे म्हणजे यंदाच्याच वर्षी जानेवारीमध्ये असं वाटायला लागलं की ही वाढ चांगली का वाईट? यातून फक्त माझा स्वार्थ साधला जातोय का? सामाजिक प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हे लिखाण होतंय का? प्रत्येक जण स्वतःची अशी, स्वतःच्याच आयुष्यात लढाई लढतोय मग आपली लढाई किंवा आपलं दुखणं आपण सकल जनांना का सांगतोय? आपल्या आयुष्यात असं काय दडलंय की त्याची जाणीव सर्वांनाच व्हायला हवीये? आपण आपल्या गोष्टी दुसऱ्यांवर लादतोय का? आपलं आयुष्य किती भारीये किंवा आपण आयुष्यात असे काय तीर मारलेत म्हणून कुठंतरी नोंदवून ठेवण्याची खरंच गरज आहे का? असे अनेक प्रश्न मनाला इंगळ्या डसल्यासारखं अहोरात्र डसत होते. तेव्हा खरंच सांगायचं झालं तर त्यांची उत्तरं शोधण्याचा मी प्रयत्न केला नाही. वेळ जाऊ दिला. लिखाण थांबवलं. इन्स्टावरच्या 'मयुरस्पीकस्' नावाच्या पेजवरही शांत राहिलो.


पण आजकाल या क्वारंटिनमध्ये एखादं जुनं दुखणं परत कसं नंतर वर तोंड काढतं अगदी तसंच या भूतकाळामध्ये पडलेल्या प्रश्नांनी मला सतावलं आहे. कोणाची एक्स गर्लफ्रेंडही एवढं सतावत नाही. रिकाम्या डोक्यात खरंच खूप विचित्र विचार येतात. आणि आत्ताच या प्रश्नांची जाणीव होण्याचं मुख्य कारण म्हणजे या महिन्यातच ब्लॉग सुरू करून, पूर्ण झालेली सहा वर्षें. या सहा वर्षात मला या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीयेत. लिखाणातून मला प्राप्त होणारा आनंद, म्हणजेच माझा सेल्फ हॅपिनेस हा दुसऱ्यांसाठीही आनंदच असतो का? असा प्रत्येक लेखकाला प्रश्न पडायला हवा. खरंच कोणी केलाय का असा विचार? का आपण एक लेखक म्हणून, एक ब्लॉगर म्हणून, एक कवी म्हणून आपल्या आनंदासाठी, आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वेळ वाया घालवतोय?


माझ्या परिप्रेक्ष्यात बोलायचे झाले तर मी एवढा मोठा किंवा महान नाहीये की माझे लेख सर्वांनी वाचावेत. सर्वांना त्यातून काहीतरी शिकायला मिळेल असेही काही त्यात नाहीये. मी आतापर्यंत ब्लॉगवरचा प्रत्येक लेख समाजमाध्यमांवर शेअर करत आलोय. तेव्हा माझ्या मनात नक्की कोणता विचार होता? अगदी आत्ताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर हा लेख लिहायलाही मला ब्लॉगचाच आधार घ्यायला लागतोय आणि हीच खरी शोकांतिका आहे. मला तुमच्याकडून याची उत्तरं हवी आहेत. आणि कदाचित त्या उत्तरांवरच या ब्लॉगचं भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे कृपया लवकरात लवकर मला सांगा. जरी कशाची उत्तरं दिली नाही तरी तुम्हाला आत्तापर्यंत या ब्लॉगनं काय शिकवलं आहे ते सांगितलं तरी मला कळू शकेल.


ता. क. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमच्या प्रतिक्रिया किंवा तुमची उत्तरं कितीही रोखठोक आणि पाषाणहृदयी वाटत असली तरी मला चालू शकतील. फक्त ज्यांनी आजपावेतो ब्लॉगवरचं काही वाचलं नसेल तर ते सगळं वाचून झाल्यावरच आपलं मत व्यक्त करा. इथे प्रत्येकालाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. फक्त त्याचा स्वैराचार किंवा दुरूपयोग नकोय. बाकी आपण सुज्ञ आहात!

Saturday, 26 October 2019

'सिटिझन जर्नालिझमला नवा पर्याय'




  घरातून रोज कॉलेजला जाताना मला विविध गोष्टींचं दर्शन होतं. रोजचाच रस्ता असल्याने रस्त्यावरील एकएक गोष्ट नजरेत बसते. खड्डयांच्या गर्दीमध्ये हरवलेला रस्ता, फुटपाथवर झालेलं अतिक्रमण, ऐन कामाच्या वेळी लागलेलं ट्रॅफिक, पीएमपीच्या दारात लोंबकळणारे प्रवासी, दिवसाढवळ्या चालू असलेले पथदिवे असे अनेक 'प्रॉब्लेम्स' रोज पाहायला मिळतात. मी पत्रकारितेचा विद्यार्थी असल्याने या समस्या मनाला अधिक लागतात. वरवर या साध्या दिसत असल्या तरी पुणेकरांना यांचा प्रचंड प्रमाणात त्रास होतो. माध्यमंही या समस्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात हे मोठंच प्रश्नचिन्ह आहे. सारासार विचार केला तर या समस्यांवर कोणाकडेच ठोस उत्तर नाहीये, पण किमान पुणे शहरात या समस्या अस्तित्वात आहेत याची जाणीव तरी सर्वांना व्हायला हवी.
  
  वृत्तपत्रांतून 'वाचकांचा पत्रव्यवहार'मधूनच यांसारख्या बातम्या आपल्याला कळतात, पण दृक्श्राव्य माध्यमांवर यांसारख्या विषयांची वानवाच आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काहीतरी ठोस पावलं उचलण्याची नितांत गरज आहे. सध्याच्या या डिजिटल युगात योग्य पर्यायाची निवड करणं क्रमप्राप्त आहे, आणि म्हणूनच तीन मित्रांनी एकत्र येऊन 'न्यूजलूक' (Newslook) या 'सिटिझन जर्नालिझम'वर आधारित पची निर्मिती केली आहे. प्रतिक मासुळकर, रोहित गिते, अक्षय नारखेडे या तरुणांनी वाचकांचा पत्रव्यवहार म्हणजेच Letters to the Editor याच्यापुढे जाऊन, आजच्या डिजिटल युगात या पच्या माध्यमातून भक्कम पाऊल टाकलं आहे.



  
  रस्त्यावरून जाताना दिसलेली कुठलीही समस्या असेल, लगेच त्याचं छायाचित्र किंवा व्हीडिओ काढून या ॲपवर टाकता येतो. कोणतंही छायाचित्र किंवा व्हीडिओ जतन करून नंतर वापरण्याची या ॲपमध्ये सोय नसल्याने हेच या ॲपचं वेगळेपण आहे. यातूनच पत्रकारितेसाठी आवश्यक असलेली 'विश्वासार्हता' जपली जाते. छायाचित्र किंवा व्हीडिओ पोस्टमध्ये समाविष्ट करणं बंधनकारक असल्याने या ॲपवर 'फेक न्यूज' पोस्ट करता येत नाही. याचबरोबर छायाचित्रं आणि व्हीडिओला कॅप्शन आणि डिस्क्रिप्शन द्यावं लागतं. थोडक्यात सांगायचं तर या ॲपमुळे आता लोकांच्या 'खऱ्या समस्या' समोर येणं सोपं होणार आहे.
  ही सर्व झाली या ॲपची माहिती. पण या ॲपमुळे नक्की काय परिणाम साध्य होत आहेत की होणार आहेत हेही आपण पाहायला हवं.
  
  सामान्य नागरिकांच्या हातात 'न्यूजलूक'च्या माध्यमातून एक अनोखी ताकद आली आहे. कुठल्याही वृत्तसंस्थेला कोणाचे तरी पाठबळ असतं त्यामुळे कदाचित त्या वृत्तसंस्थेवर, काम करण्याच्या शैलीवर फरक पडतो पण 'न्यूजलूक' या बाबतीत फार वेगळं आहे. टीआरपीचे गणित आणि कोणत्याही आयडोलाॅजीचे पाठबळ नसल्याने सर्वसमावेशक न्यूज कंन्टेट आपल्याला 'न्यूजलूक'वर पाहायला मिळतो.

  आपल्या आयुष्यात आपल्याला कुठल्याही आपत्तीला कधीही सामोरं जावं लागतं. आत्ताचंच उदाहरण घेतलं तर पुण्याच्या दक्षिण भागात म्हणजेच कात्रज, लेकटाऊन परिसरात अंबिल ओढयाला पूर आला होता. अशावेळी नागरिकांना तातडीच्या आणि गरजेच्या सूचना द्यायला कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती. दुर्दैवाने व्हाॅटसप आणि बाकीच्या सोशल ॲपवरूनही काही दिसत नव्हतं. यांसारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत 'न्यूजलूक' सारख्या ॲपचा नक्कीच उपयोग होईल. नागरिकच, नागरिकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत सूचना, संदेश देतील. कुठे रस्ता बंद केलाय, कुठले रस्ते टाळले पाहिजेत, कुठे मदतीची गरज आहे यांसारख्या प्रश्नांना या ॲपवरून थेट उत्तर मिळणार आहे.
  
  या ॲपचा आणखी एक परिणाम म्हणजे लोकं आपल्या समस्या मांडणार आणि बाकीचे त्या समस्यांचं लवकरात लवकर कसं निराकरण होईल हे पाहणार. यातूनच वेगवेगळे स्थानिक समुदाय बनतील. हेच समुदाय लोकांसाठी काम करतील, लोकांच्याच विकासाचा विचार करतील. 'स्थानिक ते स्थानिक' असा प्रवास नक्कीच पुणे शहराला एक नवीन दिशा मिळवून देईल यात शंका नाही.

  शेवटी फक्त एकच सांगणं आहे, की हे ॲप जरूर वापरून पहा. कुठलीही गोष्ट वापरून किंवा जवळून पाहिल्याशिवाय त्या गोष्टीबद्दल काहीतरी मत बनवणं चुकीचे आहे. त्यामुळेच एकदा वापरा, नीट अनुभवा आणि आम्हाला नक्की कळवा!
  
  खालील क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही ॲप इन्स्टॉल करू शकता. त्याचबरोबर लिंकही दिली आहे. तसेच तुम्ही आमच्याशी फेसबुक, इन्स्टाग्राम यावरूनही कनेक्ट होऊ शकता. त्याच्याही खाली लिंक्स दिलेल्या आहेत.

इन्स्टाग्राम: https://instagram.com/newslookpune?igshid=1jtxfxg7i5vxc

वेबसाइट: www.newslookmedia.com

ई-मेल: info@newslookmedia.com






Sunday, 7 April 2019

असे पाहुणे येती....



जानेवारी महिन्यात युरोप व मध्य आशियातून आपल्याकडे अनेक पंखवाले पाहुणे दाखल होत असतात. पृथ्वीवर एकाच वेळी  उत्तर आणि दक्षिण गोलार्धात वेगवेगळे हंगाम आणि तापमान असते. याचा फायदा घेऊन अनेक पक्ष्यांच्या प्रजाती आपल्या राहण्याच्या जागा काही महिन्यांसाठी बदलतात. साधारण नोव्हेंबर ते मार्च या महिन्यात हे स्थलांतर होतेयामध्ये विविध पाणपक्ष्यांचा आणि माळावरच्या पक्ष्यांचा समावेश असतो. सुमारे १५९ प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून भारतात येतात. यामध्ये थापट्यानकटाशेंडीबदकलालसरीथोरले व धाकटे मरालतरंगगडवालचक्रवाक ही बदके तसेच कादंब व पट्टकादंब हे हंस येतात. चमचाअवाकतुतवारशेकाट्याकारंडवउचाटसोनचिलखाकुरव असे पाणथळीचे पक्षीही असून गप्पीदासकस्तुरशंकररोहितधोबीक्रौंच या पक्ष्यांबरोबरच दलदल ससाणाशिक्राकवड्या हे शिकारी पक्षीही येतात. 
हे सर्व स्थलांतरित पक्षी पाहायला कुठे जायचे असा अनेकांना प्रश्न पडतो. यातलेच "महाराष्ट्रातील भरतपूर" म्हणून ओळखले जाणारे ठिकाण म्हणजे भिगवण! 


भिगवणची सांज 


पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रतला परिसर म्हणजे भिगवण. भीमा नदीवर बांधलेल्या धरणामुळे डिकसळ पारेवाडी आणि दळज कुंभारगाव हे दोन भाग पाणथळीच्या जागा बनल्या असून इथे दरवर्षी हजारो स्थलांतरित पक्षी येतात. या परिसरातरोहित पक्षी अर्थात फ्लेमिंगो हजारोंच्या संख्येत पाहायला मिळतात. याच पाणथळीत अनेक प्रकारची बदकंबगळेकरकोचे तर पाहायला मिळतातचजोडीला इतर पाणपक्षी आणि माळरानावर आढळणारे पक्षी इथे हमखास दर्शन देतात. पुणे आणि सोलापूर शहरांपासून अवघ्या सव्वाशे किलोमीटर्सच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणाला हमखास स्थलांतरित पक्षी दिसण्यामुळे अलीकडेच खूप लोकप्रियता मिळायला लागली आहे. 


रोहित अर्थातच फ्लेमिंगो पक्षी 

चमच्या 

चित्रबलाक आणि चमच्यांचा समूह 

थंडीच्या काळात आपल्याकडे येणाऱ्या आणि दीर्घकाळ मुक्काम ठोकणाऱ्या काही पक्ष्यांच्या लकबी व सवयींच्या जोडीला केल्या जाणाऱ्या वैशिष्टयपूर्ण गोष्टींकडे लक्ष दिले  तर कित्येक वैविध्यपूर्ण गोष्टी नजरेस पडतात. या निरीक्षणात सहजच पाणथळीत आपल्या चमच्यासारख्या चोचीने पाणी ढवळत आणि खाद्य पकडत फिरणारा युरेशिअन स्पुनबिल अर्थात चमच्या पक्षी नजरेस पडतो. या चमच्याच्या जोडीलाच भरपूर संख्येने दिसणारी बदके म्हणजेच रुडी शेलडक ऊर्फ ब्राह्मणी बदक हिमालयातून आपल्याकडे थंडीसाठी स्थलांतर करून आलेली दिसतात. सौम्य हलक्या भगव्या रंगाची ही बदके आपल्या थव्यात मुक्तपणे फिरताना पाहणेही आनंदाचा अनुभव असतो. रुडी शेलडक्सच्याखेरीज कुंभारगाव परिसरात पांढऱ्या मानेचे करकोचेचित्रबलाक, राखी व जांभळा बगळापाणकोंबडयाकोतवालघारीगरुड अशा अनेक सुपरिचित पक्ष्यांच्या जोडीनेच भिगवण परिसरात गेली काही वर्षे रोहित पक्षी म्हणजेच फ्लेमिंगो पक्षी अगदी हजारोंच्या संख्येने वास्तव्यास येत आहेत. 

रोहित 

साधारण साठ इंचांपर्यंत वाढणारा नर रोहित पक्षी तर माणसापेक्षाही उंच वाटू शकतो. या रोहित पक्ष्याचे वैशिष्टय म्हणजे याचा अतिशय उजळ रंगतो  रंग त्याला त्याच्या सातत्यपूर्ण आहारामुळेच लाभत असतो. उलटा एस ठेवल्याप्रमाणे दिसणारी मान खाली घालूनस्वत:च्या वैशिष्टयपूर्ण वाकडया चोचीने उथळ पाणथळीच्या दलदलीतआपलं भक्ष्याच्या शोधार्थ  हिंडणारे हे रोहित दलदलीत सापडणाऱ्या सर्व जिवांसोबतच 'श्रीम्प्सनावाच्या कोळंब्या आवडीने खातातत्यातून त्यांना हा रंग कायम राखता येतो. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांच्या पिसांवरचे हे रंग दिसायला सुरुवात होतात. आश्चर्य म्हणजेया ‘स्टेबल डाएट’ची कमतरता असतेतेव्हा या रोहित पक्ष्यांचा रंग फिक्कट तर होतोच शिवाय खाण्याची कमतरता निर्माण झाल्यास ते चक्क प्रजोत्पत्ती करणे टाळतात. ही अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून ते सतत सुरक्षित आणि मुबलक खाणे उपलब्ध असेल अशा ठिकाणांना जाणे पसंत करतात. उजनी धरणाच्या पाणफुगवटयाने परिसरात निर्माण झालेली पाणथळ या रोहित पक्ष्यांसाठी जणू नंदनवनच आहे असे  म्हणायला हरकत नाही. 

सकाळच्या प्रहरी चित्रबलाक पक्षी न्याहारीचा आस्वाद घेताना  
मोठया संख्येने समूहात राहाणारे हे पक्षी हॉर्न वाजवल्यासारखा कलकलाट करून एकमेकांशी संवाद साधतात. याच जोडीला पंख फडफडवूनमान वेळावूनही ते मूक संभाषण करत असतात. समूहात राहणाऱ्या या पक्ष्याला त्याच्या निवासाजवळ इतर प्राणी-पक्षी अथवा मानवी हस्तक्षेप झालेला अजिबात आवडत नाही. हे असे हस्तक्षेप व आवाज सतत व्हायला लागले तर ते त्या निवासातून बाहेर पडतात. 

भिगवणची संध्याकाळ 

भिगवण परिसरात
 यावर्षी झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणसाठयात पाण्याचा फुगवटा जास्त आहे. यामुळे अगदी काठाकाठावर दिसणारे पक्षी कमी असूनहातात पुरेसा वेळ घेऊन गेल्याससूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा गाठल्यास पाणसाठयावर नांदणाऱ्या अनेक पक्ष्यांचे दर्शन हमखास होईल. सूर्योदयाच्या सुमारास पाखरांची पाणवठयावर येण्यासाठी सुरू झालेली लगबगरात्रीच्या विश्रांतीने ताजीतवानी होऊन आपले भक्ष्य म्हणून लहान पक्ष्यांना घाबरवणारी घार आणि तिच्या मागे जीव तोडून आणि जिवावर उदार होऊन लागणारा कोतवालथंड पाण्यात खोलवर डुबकी मारून ओले झालेले पंख सुकवण्यासाठी उन्हात बसलेले पाणकावळेआपले उंच पाय आवरत तुरुतुरु धावणाऱ्या शेकाटयाविजेच्या उंच खांबावर बसलेला मच्छीमार अशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतची भिगवणची 'उडती दुनियापाहण्यासाठी भिगवणला एकदातरी जायलाच हवे.


भिगवणची 'उडती दुनिया' पाहण्यासाठी क्लिक करा...