November 2016

Sunday, 13 November 2016

वाढदिवस..








कधी कधी मला प्रश्न पडतो कि वाढदिवस आपण का साजरा करतो?सगळ्यांना जेवायला बोलवतो,केक कापतो,भेटवस्तू मिळतात या सर्व गोष्टी  यावेळीस घडतात पण त्यापलीकडे जाऊन विचार केला तर या दिवशी वाढणाऱ्या वयासाठी आनंद व्यक्त करायचा कि आयुष्यातील कमी होणाऱ्या दिवसांसाठी दुःख व्यक्त करायचे हा प्रश्न मला पडतो.

आपण मुख्यतः आनंद म्हणून वाढदिवसाकडे बघतो.वर्षभरातून एकदाच येतो.आपल्या मनासारख्या गोष्टी या दिवशी होतात म्हणून कदाचित आपल्याला या दिवसाचे अप्रूप वाटते.लहानपणी मोठ्या प्रमाणात साजरा होणारा वाढदिवस,आपण मोठे झाल्यावर त्याचे साजरा करण्याचे प्रमाण कमी होते.वयानुसार जशी अक्कल येते तसे वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण बदलते.

आजकाल  मला वाढदिवस साजरा करण्याच्या काही पद्धती खटकतात.लहानपणी केकचा प्रत्येक टुकडा खाणारे आपण आजकाल सरळ तोंडाला केक फासतो हे अक्कल खूपच जास्त आल्याचे प्रमाण वाटते.
केक फासायचाच असेल तर तो थोड्या प्रमाणात फासला तर काही हरकत नाही पण लोक सरळ आख्खा केक तोंडाला फासतात,त्यात त्या बिचाऱ्या केकचा काय दोष? एकूणतः मला हि पद्धत चुकिची वाटते कारण माझ्या बाबतीत केक फासण्याचा दुर्देवी प्रकार घडला आहे.


हाच तो २०१४ मधे घडलेला दुर्देवी प्रसंग 😉



काही वेळा केकपेक्षा या दिवशी केलेल्या चांगल्या कृती,संकल्प आपल्याला कायम लक्षात राहतात.केक खाऊन आलेल्या क्षणभंगुर गोडव्यापेक्षा या दिवशी केलेली कुठलीही चांगली कृती माणसाला आयुष्यभर टिकून राहणारा गोडवा देते.


वाढदिवस हा स्वतःशी संवाद साधायला असतो असे मला वाटते.वर्षभरात मी किती माणसे जोडली,त्यांच्याशी
किती बोललो,कोणकोणत्या चांगल्या कृती मी वर्षभरात केल्या अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे या दिवशी स्वतःला विचारायला हवीत.या दिवशी मिळणारी प्रत्येक उत्तरे आपल्याला आयुष्यात फार उपयोगी ठरतात.स्वतःचे केलेले सिंहावलोकन हे आपल्या भविष्यासाठी फायदेशीर असते.स्वतःच्या वर्षभरात झालेल्या चुका त्या भविष्यात परत होणार नाहीत याची काळजी आपण घ्यायला हवी.


आयुष्यातील दुसरा वाढदिवस 


प्रत्येकाचा वाढदिवस असतो.तो कसा साजरा करायला हवा,त्या दिवशी काय करायला हवे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तो फक्त साजरा न करता आपल्या वर्षभराच्या किंवा आयुष्यातील गोष्टींचे चिंतन झाले तर त्या वाढदिवसाला अर्थ असतो असे माझे मत आहे.बाकी वाढणाऱ्या वयासाठी आनंद व्यक्त करायचा कि आयुष्यातील कमी होणाऱ्या दिवसांसाठी दुःख व्यक्त करायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे!! 

Friday, 11 November 2016

Okay...











 Okay…









'Hmm,Okay' असे शब्द आजकाल माझ्या फार डोक्यात जातात.'Whatsapp,Facebook' कुठेही Hmm,Okay अशाप्रकारच्या शब्दांचे रिप्लाय आले कि डोके आपटून घ्यावेसे वाटते. संवादाला कुठेतरी सुरुवात होत असताना मोबाईलच्या स्क्रिन वर असे शब्द झळकले कि क्षणार्धात मोबाईलचे तुकडे करावसे वाटतात.माझे चिडण्यामागचे एवढंच कारण आहे कि लोक मुद्दामून अशा शब्दांचा वापर करतात.


संवाद हि दोन माणसांची ओळख होण्याची पहिली पायरी असते पण असे शब्द त्यामधे अडथळा निर्माण करतात.संवाद सुरू होत 
असताना अशा शब्दांची गरज नसते.सुरु होणारा संवाद लगेच बंद करण्याचे काम असे शब्द करतात.अशा शब्दांच्या वापरामुळे 
माणूस जोडण्याचे काम करणारा संवाद फिका पडतो.दोन लोकांच्या संवादामधे एखाद्या माणसाला बोलायचे असते,मनातील सर्व 
सांगायचे असते,रोजच्या आयुष्यातील घटना सांगायच्या असतात पण असे शब्द वापरल्यामुळे तो निराश होतो.निराश झाल्यावर 
पुढे त्याची संवाद साधायची इच्छा निघून जाते.



काही काही वेळा फक्त बोअर होत आहे म्हणून पण लोक अशा शब्दांचा वापर करतात.'मला बोअर होत आहे
असे स्पष्ट का बोलत नाही याचे मला अद्याप कारण सापडलेले नाही.समोरच्या माणसांची किम्मत शून्य ठरवून हे 
बिनधास्त Hmm,Okay शब्दांचा वापर करतात तर कधी कधी Ttyl या शब्दाचा वापर करतात. 



लोकं काहीवेळा दुसरा कुठला रिप्लाय  सुचल्यामुळे Hmm,Okay अशा प्रकारच्या शब्दांचा वापर रिप्लाय देण्यासाठी करतात.यावेळी त्यांना दोष देता येत नाही कारण समोरचा माणूस त्यावेळीस नीट संवाद साधत नसतो पण माझ्या मते अशावेळीस 
Hmm,Okay असे शब्द टाळून संवादात वेगळ्या विषयांवर बोलायला हवेवेगळ्या गोष्टींवर विषय गेला कि असे शब्द 
आपोआप मागे पडतात.


   




   
    आपण Whatsapp,Facebook भरपूर वापरतो.आपली ती दैनंदिन गरज झाली आहे म्हणूनच अशा साधनांचा संवाद 
साधण्यासाठी वापर करताना आपण भान राखले पाहिजेल.समोरून भेटताना आपण मुख्यतः Hmm,Okay असे शब्द फार कमी वापरतो.आपला फारच मुक्त संवाद होतो.मुक्त संवादामुळे आपण लगेच एकमेकांशी जोडले जातो पण ऑनलाइन प्रकारात तेवढाच 
मुक्तपणे संवाद साधला जात नाही.मनातील भावना इमोजी द्वारे बाहेर पडतात.इमोजी वरून व्यक्तिच्या भावना ओळखल्या जातात.
जेवढा समोर जाऊन,भेटून,बोलून जिवंत संवाद साधला जातो तेवढ्याच ताकदीचा ऑनलाइन संवाद होत नाही हे वास्तव आहे आणि तो झाला तरी त्याच्या आधारावर झालेली नविन नाती जास्तकाळ टिकत नाहीत.मानवी आयुष्यात संवाद हा फार महत्वाचा आहे.संवादाचा योग्य वापर व्यक्तीला जास्तीतजास्त चांगली  आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडून देतो.


Monday, 7 November 2016

'कौल'


                    
            भिडला तर चित्रपट                  भिनला तर विचित्रपट 


  चित्रपटाच्या सुरुवातीपासून पडद्यावरती असलेली नजर चित्रपट संपल्यावर सुद्धा पडद्यावर टिकून राहते हे "कौल" या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे.चित्रपट बघून झाल्यानंतरच्या धक्क्यातून आपण सावरून बाहेर पडतो तरीपण डोके सुन्न करून टाकणारी कथा आयुष्यातील प्रत्येक क्षणी विचार करायला भाग पाडते.


   आपण या चित्रपटाचा सुरुवातीपासून एक भाग होऊन जातो.कोकणातील निसर्ग,पाऊस,धुकं,काळोख,रात्र,दिवस,बैटरीचा उजेड,रेडिओ,भास-आभास,स्वप्नं या गोष्टींमुळे आपण चित्रपटातील एक पात्र होऊन जातो.चित्रपटातील प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यातील वाटतो.हा चित्रपट मनाला वेड लावतो.हा चित्रपट बघत असताना आपल्याला कसलेही भान राहत नाही.या चित्रपटाला कथा आहे पण कथानक नाही कथेत आपण एवढे गुंततो की आपल्याला स्वतःचा विसर पडतो स्वतःचे अस्तिव,स्वतःच्या अस्तित्वाचा घेतलेला शोध,चमत्कार,तो झाल्यानंतर आलेले चित्र-विचित्र अनुभव,त्याचे लावलेले संबंध या सर्व गोष्टींनी या चित्रपटाची कथा बहरली आहे आणि त्यामुळेच ती आपल्याला भावते. 


  उत्कृष्ट छायाचित्रण चित्रपटाचे महत्व वाढवते हे या चित्रपटाने सिद्ध केले आहे.मलातरी आजतागायत मराठी चित्रपटात असे छायाचित्रण पाहायला मिळाले नाही असे वाटते.चित्रपटातील काही दृश्ये अक्षरशः वेड लावतात 
दिग्दर्शकाने चित्रपटाची प्रत्येक फ्रेम विचारपूर्वक लावली आहे.प्रत्येक फ्रेमला अर्थ असून त्या चित्रपटाचा आशय उंचावतात. 


  उत्कृष्ट छायाचित्रणाबरोबरच चित्रपटातील ध्वनी हा चांगलाच भावतो.ध्वनी हा या चित्रपटातील एक महत्वाचा घटक असून त्याचे संयोजन पण दिग्दर्शकाने उत्तम केले आहे.प्रेक्षकाला चित्रपटाशी जोडून ठेवण्याचे काम ध्वनीने केले आहे.चित्रपटात योग्य त्या ठिकाणी ध्वनीचा चपखल वापर दिग्दर्शकाने केला आहे.


  चित्रपट संपल्यावर आपल्या डोक्यातून या चित्रपटाचा विचार जात नाही.आपण स्वतःलाच प्रश्न विचारात बसतो असे फार कमी चित्रपट पाहून झाल्यावर होते.आदिश केळुसकर यांचा हा पहिला प्रयत्न आहे पण त्यांची ही झेप फारच विलक्षण आहे.असे
पहिल्यांदा वेगळ्या आशयाचे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले आहे यात तिळमात्र शंका नाही.पहिल्याच चित्रपटात असा प्रयत्न करणे फारच कौतुकास्पद
आहे त्यांच्या ह्या प्रयत्नाने प्रत्येक जण समृद्ध होईल अशी आशा!! 




          हा चित्रपट का बघावा??
मराठी चित्रपटसृष्टी मधे आजतागायत न झालेल्या उच्च दर्जाच्या छायाचित्रणासाठी!! 
वेगळा आशय व वेगळा अनुभव अनुभवण्यासाठी!! 
नवोदित तरुण दिग्दर्शकाच्या कष्टांसाठी!! 
चित्रपट नाही तर एक विचित्रपट म्हणून!! 
स्वतःच्या अस्तित्वाचा घेतलेला शोध जाणून घेण्यासाठी!! 


 हा चित्रपट १८ नोव्हेंबर ला प्रदर्शित होणार आहे तरी आपण सर्वांनी तो जरूर पहावा असे मला वाटते.


चित्रपटाचा टीजर:
https://www.youtube.com/watch?v=DYpKxm3x8sM